Showing posts with label राष्ट्र. Show all posts
Showing posts with label राष्ट्र. Show all posts

अखेर कमाई...

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले,
शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.

शिवाजीराजे म्हणाले,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले,
मी फ़क्त बौद्धांचा.

टिळक उद्गारले,
मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

तुला परत यायचं असेल तर

महात्म्या, तुला परत यायचं असेल तर,

तुझी ती अहिंसा तेथेच ठेवुन ये.
कारण आज तिला आमच्याकडे काहीच किंमत नाही
आज अहिंसेला आम्ही अडगळी शेजारी जागा दिलीय,
कारण अहिंसा म्हणजे आज फक्त गांधीवाद्यांची झालीय...

अहो गांधीवादी तरी कसले ते...?
नुसते गांधीवादी म्हणवुन घेणारे,
आणि अंधारात सत्तेसाठी...
सत्त्यासाठी नव्हे महात्म्या, सत्येसाठी!
अंधारात सत्तेसाठी पाठीत खंजर मारणारे,
आणि डळमळत्या खुर्चीला...
पडण्याआधी तारणारे.
हे आजचे अहिंसावादी...
हे आजचे गांधीवादी.
म्हणुन अहिंसा नको.

आणि हो, तो सत्याग्रह तरी कशाला आणतोस?
कुणाचे ग्रह हलणार आहेत त्यानं?
कुणाचे विचार बदलणार आहेत त्याने?
महात्म्या, ते प्रेम ही नकोस आनू
दोन दिवसात पार बो-या वाजेल त्याचा,
आजच्या स्पर्धेच्या युगात.
कारण, आज आम्ही धावण्याची शर्यत...
प्रेमाने नाही तर पायात पाय घालुनच जिंकतो...
आणि हो, आम्ही कुणाचं भलं करु...
अशी आशाही आमच्याकडुन करु नकोस,
कारण तिथच तर आम्ही शिंकतो
म्हणुन प्रेम ही नको.

आणि महात्म्या ती, करुणा आणि शांती,
ती तर नकोच नको.
गांधीवादाचे पुरस्कर्ते म्हणुन ठेवली होती...
हीच नावे आम्ही आमच्या मुलींची
पण तीही त्यांनी कधीच बदललीत,
आजच्या आधुनीक युगात 'सुटेबल'
होत नाहीत म्हणुन

तेंव्हा आता यायचं असेल तर,
सत्त्यासोबत असत्त्यालाही घेऊन ये.
आता चरखा नकोय ...
एखादी गन घेऊन ये,
महात्म्या तु जरुर ये.... पण येताना,
आमच्या सारखंच पांढरपेशी मनही घेवुन ये!

हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे....

उचलूनी देह ताठ नयनांतून आग ज्यांनी ओकली
क्रौर्यतेच्या राक्षसांची मान पराक्रमाने छाटली
फळ आज उपभोगतो ज्यांच्या शर्थ प्रयत्नांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.

स्वप्नभरारी ज्यांनी वास्तवात आहे घेतली
क्षणोक्षणी मोहमाया देशासाठी लाथाडली
सुख इतरांना देण्या दुःख जे स्वतः विसरले
माणूसकी जपण्यास ज्यांनी आयुष्य सारे वेचले
व्हावे नतमस्तक फक्त नाव घेता ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.

कोण मी, जन्मलो का हे स्वतःस ज्यांनी विचारले
नुसतेच नाही पूर्वजांच्या पुतळ्यांस सलाम ठोकले
विचार ज्यांचे अस्त्र अन व्यक्त होण्या धमक आहे
यौवनाचा रंग ज्यांच्या रक्त जैसा लाल आहे
जाणूनी पुरुषार्थ जाणीवेने पेटले ऊर ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.

निरक्षरता भ्रष्ट आचार अन जातीपातीची घाण
जाणूनी मूल्ये ज्यांनी फडकवले बंडाचे निशाण
शिकवण्या दुसऱ्यास आधी ज्यांनी स्वतः नियम पाळले
वादळाचे घर ज्यांनी स्वतःत आहे बांधले
मुक्त होण्याचे स्वप्न पाहण्या नयन आहेत समर्थ ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे….!