इथे एवढंच सांगण्याचा निरपेक्ष प्रयत्न आहे की दोन तत्वज्ञानी लोकांची तत्वंच कशी काय त्यांच्या प्रेमाआड उभी राहतात..आणि मग प्रेमाविन ते संपुन गेल्यावर फ़क्त तत्वंच शिल्लक राहतात……….
दोन तत्वज्ञानी आणि प्रेम……..
अतोड तटबंदी भेदुन,
एका झुळुकेचं येणं झालं
वाडा चिरेबंदी पाहुन
सर्वत्र फ़िरण्याचं मन झालं,
गावासाठी तो होता
एक महाल आलिशान
पण आतुन फक्त तो होता
एक खंगलेलं रान
एक कस्तुरकुपी तिथली
हळुच तिने लकटली
सुगंधात मुग्ध न्हाली
वाड्यात इतरत्र फ़िरु लागली
वाडाही आता बहरुन
आनंदविभोर झाला होता
काळाच्या झोपेतुन उठुन
नंदकिशोर बागडला होता
तटबंदीने आजपर्यंत
बरीच प्रलयं रोख़ली होती
पण आज एका लहरीपुढे
ती नतमस्तक झाली होती
झुळुक विचार करु लागली
वाड्याला वेडा ठरवु लागली
स्वत:च्या भानात हरवु लागली
त्याला स्वाभिमान नाही हिणवु लागली
माहीत नव्हते बिचारीला
वाड्यानं काय काय झेललं होतं
सगळ्यातुन स्वत:ला वाचवुन
कशासाठी असं जपलं होतं
गुमान ती त्याला दुर्लक्षिली
पुढल्या वेळी हळुच दुरुन गेली
तिच्या वागण्याने तटबंदी आनंदली
पण वाड्याच्या आत ख़ळबळ माजली
बाहेरुन आलंच जर वादळ तर
ती तटबंदी उभी होती पण
आत उठलेल्या वादळासाठी
मात्र काही काहीच नव्हतं
झुळुकेविन ‘ख़ंगला वाडा’
आता पुर्णच मोडला होता
गर्वापायी त्या झुळुकेनं मात्र
एक नवा पायंडा पाडला होता…
कारण आता वाडा तिच्यापायी
झुरण्यासाठी उरलाच नव्हता
उरली होती ती फ़क्त
फ़क्त ती ख़ुश तटबंदी………………
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment