समाजव्यवस्थेचा कणा : आई

खरे म्हणजे आईविषयी इतके लिहीले गेले आहे, कथा, कादंबऱ्या आणि बॉलीवूडने आईला अजरामर केले आहे, त्यामुळे मी आता वे
गळे काय सांगणार असा प्रश्न वाचकाला पडणे साहजिक आहे.

मी वयाची पन्नाशी पार केल्यावर आणि माझ्या आईने ऐशी वर्षे ओलांडल्यावर तसेच अनेक मित्र आणि आजूबाजूच्या अनेक आयांना बघितल्यावर जाणवणारी बाब म्हणजे भारतीय समाजव्यवस्था टिकून आहे ती आई या बळकट वटवृक्षामुळे.

मुळात आईपण ही बाबच खडतर आहे. मुल कितीही मोठे झाले तरी त्याला आईची गरज भासते. किंबहुना माणूस वयाने वाढला की त्याला आईचे महात्म्य अधिक दिसू लागते. तरुणपणाची मस्ती उतरली की आधार आईचाच असतो हे त्याला जाणवू लागते. एका टप्प्यावर मित्र, मैत्रिणींचे स्थान आईपेक्षा वरचे ठरते. त्यांचा सल्ला घेतला जातो. नोकरी वगैरे लागली की आलेल्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे आईचा सल्ला न घेण्याकडे कल असतो. मग तिने आपल्याला अनेकदा कठीण परिस्थितीतून सावरलेले असते, आपल्याला सांभाळुन घेतलेले असते, अनेक गुन्हे वडीलांपर्यंत न पोहोचवताही आपल्याला कानपिचक्या दिलेल्या असतात, वेळप्रसंगी आपण दोन घास कमी खाऊन आपल्याला काही कमी पडू दिलेले नसते या साऱ्या बाबींचा विसर पडतो.

नंतर लक्षात येते की आईने वेळोवेळी दिलेले सल्ला, सावधानतेचे इशारे, मांडलेली मते ही अधिक दिशादर्शक होती. त्यात आईकडे अनुभवातुन आलेले शहाणपण तर होतेच, पण मायेचा अखंड स्त्रोतही होता. संसार कसा करावा. कोणाला टाळावे आणि कोणाला महत्त्व द्यावे, पैसा कसा वाचवावा अशा अनेक बाबींमध्ये तिचा दृष्टिकोन बराच पुढचा विचार करणारा होता.

आई ही संस्था कुटुंब टिकवण्यात मोलाचा वाटा उचलते. आता आया नोकरी करायला लागल्या, त्या स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. परंतु, अगदी काही वर्षांपूर्वींपर्यंत आईने घर सांभाळायचे, आल्यागेल्यांचे करायचे, मुलांची काळजी घ्यायची, सणउत्सव साजरे करायचे आणि मुख्य म्हणजे हे सारे घरातल्या र्कत्या पुरूषाने दिलेल्या मर्यादित रकमेत पार पाडायचे. हे करताना अडीअडचणीसाठी बचत करायची, मुलांच्या भविष्याची तरतूद करायची. हे करत अनेक आयांनी आपल्या मुलांना मोठे केले. त्यांचे कर्तृत्व फुलवले. त्या काळात गरिब असणाऱ्यांची संख्या बरीच मोठी होती. त्यामुळे परिस्थितीशी झगडत प्रपंच करणाऱ्या आयाही बऱ्याच होत्या. आता तुलनेने मध्यम वर्ग वाढला आहे परंतु यामुळे आईची जबाबदारी बदलली आहे असे नव्हे. आजही नोकरी करणाऱ्या आईला घर सांभाळावेच लागते. मुलांचा अभ्यास, त्यांचे खाणेपिणे याचा विचार करावा लागतो. नातीगोती सांभाळावी लागतात. आजची आई त्यामुळे लोकलमध्ये भाजी निवडताना दिसते आणि पहाटे उठून डब्यांची तयारी करताना दिसते.

यात आश्चर्याची आणि कौतुकाची बाब अशी की आईची भूमिका पार पाडताना ती आपण काहीच विशेष करत नाही अशा आविर्भावात वावरत असते. अनेकदा यात ती स्वत:च्या आवडीनिवडींकडे, प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असते. पूर्वीच्या जमान्यात हे अधिक प्रमाणात घडत होते, कारण स्वत:चा विचार करायला तिला सवडच नसायची आणि पैसेही.

आईच्या भूमिकेत असतानाही ती, पत्नी, सुन, भावजय, नणंद अशा अनेक भूमिका सहजतेने पार पाडत असते. हल्ली कुटुंबाचा आकार कमी झाला आहे, माणसे सहजतेने एकमेकाकडे जातयेत नाही. पूर्वी बॅग घेऊन नातेवाईक कधीही यायचा. तो नोकरीसाठी नाहीतर शिक्षणासाठी आलेला असायचा. त्याचा मुक्काम किती दिवस आहे हे माहीत नसायचे. तो नातेवाईकही दूरचा असायचा. पण पाहुणचार करताना आईच्या चेहऱ्यावरचे स्वागताचे भाव कमी होत नसत. आज अर्थातच हे कमी झाले आहे. पण अशी परिस्थिती आली तर तिच्यात आईची माया जागी होईल यात शंका नाही.

सर्वांना जोडणारा दूवा असेच आईचे रूप राहीले आहे. तिच्यामुळे चार भिंती न राहता घर बनले आहे, घरपण राखले गेले आहे. आई म्हटल्यावर हे सारे आठवते. मग ती आई कोणाचीही असो. अशा आईला खरे म्हणजे वर्षाचे ३६५ दिवसही वंदन करायला हवे. निदान मातृदिनी तरी आपल्या आयुष्याला वळण लावणारी म्हणून तिचे पूजन करायला हवे.

म्हातारपण

एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे
येत नाही म्हणत, ऐकू कान सोडून गेले
वाक्यामधले अधले मधले शब्द सोडून गेले
चष्मा खराब, डोळे खराब काही कळत नाही
मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही
जेवण संपवून दंताजींची पंगत उठली सगळी
जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवळी
कंप कंपनीचा संप करतात बोटे काही
कापत रहातो पायच नुसता , अंतर कापत नाही
देहसदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे
जूने झाले बांदे, तरी आखडून वाकतात खांदे
मन म्हणते, कशाला या अर्थ असतो काही?
मान म्हणते तिन्ही त्रिकाळ नाही नाही नाही
शिवून घेतला सूट नवा , सवलती सकट
सुरकुत्यांचे क्रेप कापड , शिवणावळ फुकट
इतका सारा मेकअप , आता नाटकाला मजा
मुलगे झाले आजोबा अन मुलींच्या आज्ज्या
ओबड धोबड फणसा सारखे पिकत चालले क्षण

आवाज झालाय पावरी सारखा , शेवरी सारखे मन..
एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे

... संदीप खरे ...

लाख सलाम तुझ्या-माझ्या मैत्रीला

तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
भीती नाही वाटली अंधाराची
अन अंधारात चालताना देखिल
ओढ़ होती प्रकाशाची.......
तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
पावलो पावली मिळाला विश्वास
अन मिळाला धीर संकटात .....
तुझी-माझी मैत्री बनली
एक फुलांचा नाजुक वेल
म्हणुन आपल्या मैत्रीचा
आहे अनोखा खेल......
पण तू हाथ धरलास
नि जिव माझा खुलुन आला
माझ्या आयुष्याच्या वृक्षावर
जणू गुलमोहरच खुलुन आला......
तूच शिखवलीस मला
जगण्याची खरी कला
म्हनुनच तुझ्या-माझ्या मैत्री साठी
लाख सलाम तुला.......

कधी असेही जगून बघा…..

कधी असेही जगून बघा…..
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

वाईट असते ...

मध्यरात्री जागणे वाईट असते
अन दुपारी झोपणे वाईट असते

सारखे रागावणे वाईट असते
सारखे वैतागणे वाईट असते

दूध अन फळ मिसळणे वाईट असते
फ्रीजचे पाणी पिणे वाईट असते

चिप्सपिझ्झे चापणे वाईट असते
कोकपेप्सी ढोसणे वाईट असते

दूध घेणे टाळणे वाईट असते
अन चहाकॉफी पिणे वाईट असते

प्रौढ स्त्रीला सेवणे वाईट असते
अन स्वतःशी खेळणे वाईट असते

यौवनाने माजणे वाईट असते
वृद्धपण नाकारणे वाईट असते

सप्तधातू बिघडणे वाईट असते
दोषतिन्ही बिनसणे वाईट असते

आळसाने लोळणे वाईट असते
नित्यकर्मे टाळणे वाईट असते

देह शाश्वत समजणे वाईट असते
आत्मबुद्धी विसरणे वाईट असते